
कुरुंदा पोलिस ठाणे हद्दीतील धामणगाव शिवारातील घटना, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
—–
वसमत :
—–
वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारात शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून २१ जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १५ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी स्वतंत्र पथकाद्वारे आरोपींचा शोध सुरु केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारातील गट क्रमांक १९७ मध्ये २० गुंठे जमीनीचा वाद सुरु होता. मारकोळे व पारखे यांच्यात यापुर्वीही मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही कुटुंबांच्या तक्रारीनंतर कुरुंदा पोलिसांनी दोघांनाही समजाऊन सांगत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
दरम्यान, या दोन्ही कुटुंबातील शेतीचा वाद चांगलाच उफाळला होता. १३ मे रोजी सायंकाळी या वादातून काठ्या , लोखंडी राँडने हाणामारी झाली. या मारहाणीत ११ जण जखमी झाले आहेत. घटनेच्या वेळी कुरुंदा पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींवर वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे या हाणामारीचे व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले होते.
या प्रकरणात चंद्रकलाबाई वाघमारे यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शेतीसाठी न्यायालयात का भांडता आमच्या सोबत भांडा असे म्हणून मारहाण झाल्याचे तक्रारीत नमुद केले. या तक्रारीवरून पोलिसांत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान याच प्रकरणात रमेश्वर पारखे यांनी तक्रार दिली, त्यात शेतीच्या वादातून दहा जणांनी मारहाण केल्याचे नमुद केल्याने दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रविण आगलावे, जमादार भगीरथ सवंडकर पुढील तपास करीत आहेत.
