
खानापुरचित्ता शिवारातील घटना, पाणी पिण्यासाठी कारमधून उतरल्याने चौघे जण बचावले
- ********
वसमत
********
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता शिवारात हिंगोली शहरातील चौघे जण पाणी पिण्यासाठी कारमधून उतरताच काही वेळातच कारने पेट घेतला. या घटनेमध्ये चौघे जण बचावले. तर चालक विनायक सोळंके गंभीरीरित्या भाजल्या गेले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याघटनेत कार पूर्ण जळून मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी ता. २० दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील विनायक सोळंके हे आज सकाळी हिंगोली येथून कारने भाडे घेऊन लग्नसोहळ्यासाठी जात होते. कारमध्ये हिंगोली शहरातील गंगानगर मधील तीन महिला व एक लहान मुलगी होती. हिंगोली शहरापासून सुमारे ९ किलो मिटर अंतरावर गेल्यानंतर कारमधील लहान मुलीस तहान लागली होती. त्यामुळे विनायक यांनी खानापूरचित्ता शिवारात एका हॉटेल समोर कार थांबवली. यावेळी कारमधील तीन महिला व मुलगी खाली उतरली तर चालक विनायक कारमध्येच बसून होते.
यावेळी कारच्या वायरींगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून विनायक कारच्या खाली उतरले मात्र तो पर्यंत त्यांचा हात व पाय भाजल्या गेल्या. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही शिवाय तीन महिला व मुलगी हॉटेलजवळ होत्या म्हणून त्या बचावल्या.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर, रमेश जाधव यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अग्नीशमनदलास पाचारण केले. हिेंगोली पालिकेच्या अग्नीशमनदलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेमध्ये भाजलेल्या विनायक यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे.
