
तिघांविरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना…
—–
प्रतिनिधी :
—–
वसमत तालुक्यातील हयातनगर पाटीजवळ एका हॉटेल मध्ये बसलेल्या दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना मंगळवारी ता. २४ रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. याप्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान हट्टा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध बुधवारी ता . २५ सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील थोरावा येथील विशाल मुंजाजी देवरे (२२) हा त्याचा मित्र ओमकार नरवाडे याच्यासोबत मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हयातनगर पाटीजवळील एका हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी थोरावा येथीलच गोपाळ देवरे, ऋषीकेश कदम, शिवाजी देवरे हे तिघे आले. यामध्ये दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून तेथे बसलेल्या विशाल व ओमकार याच्यावर खंजीरने वार करण्यास सुरवात केली.
दरम्यान, आचानक झालेल्या या हल्यामुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही. यामध्ये विशाल याच्या पोटावर व छातीवर खंजीरचा वर्मी वार बसला तर ओमकार याच्याही पोटावर वार बसले. त्यानंतर मारहाण करणारे तिघेही पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार ताम्रध्वज कासले, श्री सुर्यवंशी, श्री सुरेशे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी विशाल व ओमकार यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र विशाल याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर गंभीर जखमी असलेल्या ओमकार याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी ता.२५ सकाळी आदिनाथ मुंजाजी देवरे यांच्या फिर्यादीवरुन ऋषिकेश कदम, गोपाळ देवरे, शिवाजी देवरे यांच्या विरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेतील फरार आरोपींच्या शोधासाठी हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी तीन पथके रवाना केली असून त्या तिघांचाही कसून शोध घेतला जात आहे. सदर घटना मुलीच्या कारणावरून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आरोपींच्या अटकेनंतरच सर्व प्रकार उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
